Aatmanirbhar Bharat: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; 21 लाख कोटी रुपयांचे पॅकज लागू करण्यावर चर्चा
Rajnath Singh (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले 21 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज लागू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार बोलावण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या निवासस्थानी ही बैठक दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पंतप्रधान, संरक्षणमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नरेंद्र सिंह तोमर, स्मृती इरानी यांच्यासह इतरही काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.

देशासमोर असलेले आर्थिक संकट, लॉकडाऊन, देशाची बिघडलेली आर्थिक स्थिती यांवर उपाय म्हणून जाहीर करण्यात आलेले 20 लाख कोटी रुपयांच आर्थिक पॅकेज, तसेच हे पॅकेज लागू करणे अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.

कोरोना व्हायरस आणि त्याही आधिपासून घसरलेली देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंतेचा विषय आहे. ही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने जीडीपीच्या 20 टक्के आर्थिक पॅकेज घोषीत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण गेल्या पाच दिवसांपासून सायंकाळी चार वाजता सलग पत्रकार परिषदा घेत आहेत. त्याच्या माध्यमातून त्या पॅकेजबाबत माहिती देत आहेत. (हेही वाचा, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; परदेश शिष्यवृत्तीसाठी लागू केली सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा; गोरगरिबांच्या मुलांना मिळणार लाभ)

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनरेगासाठी असलेला निधी 40 हजार कोटी रुपयांनी वाढविण्याची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकारने कोळसा, खनिज, संरक्षण, विमानतळ, विद्युत वितरण, आंतराळ, परमाणू उर्जा यांसारख्या आठ क्षेत्रांच्या खासगीकरणाची घोषणाही केली आहे. केंद्र सरकारने स्वीकारलेल्या खासगीकरणाच्या धोरणाच्या प्रस्तावास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.