समरसिंह मंत्री-पाटील हे मुख्यमंत्री बनले तर 'हे' नवे बदल होतील... वाचा सविस्तर
Tejas Barve (Photo Credits: File Image)

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला मोठा प्रश्न म्हणजे 'मुख्यमंत्री कोण होणार?' भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातही या प्रश्नावर राजकीय कलगीतुरा रंगलेला असला तर महाराष्ट्राच्या जनतेने मात्र सुमीला मिसेस मुख्यमंत्री, म्हणजेच पर्यायाने समरसिंह यांना मुख्यमंत्री बनवा असं गमतीत सुचवलं आहे.

सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री पदावरून अनेक मिम्स फिरताना दिसत आहेत. त्यात 'बोलो, बनोगे एक दिन के लिये मुख्यमंत्री?' या अनिल कपूर यांच्या 'नायक' चित्रपटातल्या डायलॉगने तर नुसता धुमाकूळ घातला आहे. हाच प्रश्न मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील समरसिंह म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेला विचारताच तो म्हणाला, "जर मी मुख्यामंत्री झालो तर सर्वात आधी मी माझा कार्यकाळ वाढवून घेईन. कारण जर-तर का होईना, मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळतेच आहे, तर ती कोण दवडेल? आणि व्यावहारिकदृष्ट्या मुख्यमंत्री म्हणून एका दिवसात काम करणं शक्य नाही. ते फक्त चित्रपटातच घडू शकतं. त्यामुळे कार्यकाळ वाढवला, की राज्यातील जनतेमध्ये एकात्मता आणण्यासाठी शक्य ते निर्णय घेईन. जात, धर्म, आर्थिक विषमता यातून बाहेर पडत लोकांनी आज एकत्र आनंदी वातावरणात वावरायला हवं.

महाराष्ट्राच्या 50-50 सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम; नव्या प्रस्ताव येणार-जाणार नाही: संजय राऊत

इतकाच नव्हे तर तेजसला अजूनही काही बदल या राज्यात घडवायचे आहेत. त्या बद्दल सांगताना तो म्हणाला, "माझा दुसरा निर्णय अर्थात भ्रष्टाचाराच्या विरोधात घेईन. अनेक सक्षम तरुण यामुळे मागे पडत आहेत, पर्यायाने देशसुद्धा. त्यामुळे मला प्राधान्यानं या विषयाकडे लक्ष द्यायला आवडेल. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावण्याऐवजी प्रत्येक शेतकरी इतरांना कर्ज देण्याइतपत सक्षम कसा होईल हे मी पाहेन."

यात गमतीशीर भाग म्हणजे तेजस जरी महाराष्ट्राचा खराखुरा मुख्यमंत्री बनणार नसलं तरी मालिकेत मात्र लवकर तो या भूमिकेत दिसणार आहे.