घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर Aamir Khan आणि Kiran Rao पहिल्यांदाच आले एकत्र; चाहत्यांना दिला महत्वाचा संदेश (Watch Video)
Aamir Khan & Kiran Rao (Photo Credits: Instagram)

नुकतेच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) व पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी एका सामुहिक निवेदनाद्वारे चाहत्यांसह त्यांचा विभक्त होण्याचा निर्णय शेअर केला. आमिर आणि किरणच्या 15 वर्षानंतर घडलेल्या या घटस्फोटाबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. याबाबत लोक सोशल मीडियावर बर्‍याच गोष्टी बोलत आहेत. आता घटस्फोटानंतर आमीर आणि किरणचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते एकत्र फेसबुक लाइव्हवर बोलत होते. पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात या दोघांनीही भाग घेतला आणि दोघांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीच्या सूचना दिल्या.

याआधी दोघांनीही आपल्या संयुक्त निवेदनात जाहीर केले होते की घटस्फोटानंतरही ते चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये एकत्र काम करत राहतील. आता समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांचे हात हातात घेतले आहे. आपल्या निर्णयाबाबत ते आनंदी व समाधानी असल्याचे दिसत आहेत. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले आहे की विभक्त झाल्यानंतरही ते एकत्र काम करतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bolly insider (@bollynewsinsider)

या व्हिडीओमध्ये आमीर म्हणत आहे की, ‘आमचा निर्णय ऐकून तुम्हाला दुःख झाले असेल, शॉक बसला असेल. मात्र फक्त आमच्या नात्यामध्ये बदल झाला आहे, आजही आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही दोघेही आनंदी आहोत व आम्ही दोघांनी सुरु केलेल्या प्रकल्पांवर आम्ही एकत्र कम करणार आहोत. आमचे चाहते म्हणून तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा.’ (हेही वाचा:  आमिर खान-किरण राव यांच्या नात्याला ब्रेक, 15 वर्षानंतर घेणार घटस्फोट)

दरम्यान, किरण रावआधी आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. आमिर आणि रीना यांना जुनेद आणि आयरा ही दोन मुले आहेत. 2002 साली आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले होते. आमिर आणि किरण यांना एक मुलगा, आझाद आहे.