ICC T20 World Cup 2021 वर्ल्ड कपपूर्वी BCCI चे टेंशन वाढले, टीम इंडियाचा धाकड खेळाडू गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त; जखमी असूनही IPL मधून नाही घेतली माघार
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

ICC T20 World Cup 2021: मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेत भारताचा प्रमुख गोलंदाज मानला जात आहे. पण तामिळनाडूच्या या मनगट फिरकीपटूवर बीसीसीआय (BCCI) वैद्यकीय पथकाला खूप मेहनत घ्यावी लागेल, ज्याचे गुडघे पूर्णपणे बरे झालेले नाहीत. 10 ऑक्टोबरपर्यंत भारतीय संघात (Indian Team) बदल केले जाऊ शकतात, परंतु गुडघ्याची समस्या असूनही वरुणची गोलंदाजी लक्षात घेता तो खेळणार हे निश्चित आहे. जखमी झाल्यानंतरही तो इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये खेळत आहे. बोर्डाच्या एका सूत्राने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, "वरुणचे गुडघे फार चांगल्या स्थितीत नाहीत. ते त्याला दुखावते, पण जर टी-20 विश्वचषक नसता तर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला खेळवण्याची जोखीम घेतली नसती. त्यानंतर पुनर्वसनाचा विचार केला जाईल.” वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत आयपीएल (IPL) 2021 मध्ये 13 सामन्यांत 6.73 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत. (ICC T20 World Cup 2021: इंग्लंडच्या संघाला मोठा झटका; Sam Curran आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर)

24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी तो पूर्णपणे तंदुरुस्त असावा आणि खेळण्यासाठी उपलब्ध असावा अशी भारतीय संघाची इच्छा आहे. तसेच टीम मॅनेजमेंटला वरुणच्या कामाच्या ओझ्याची काळजी घ्यावी असे वाटत आहे. चक्रवर्ती सध्या आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट  रायडर्सकडून खेळत आहे. या दरम्यान अनेक मोठ्या संघांविरुद्ध त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कोलकाताची वैद्यकीय टीम वरुणबाबत बीसीसीआयच्या सतत संपर्कात असल्याचे समजले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “माझ्या माहितीप्रमाणे, केकेआरच्या सपोर्ट स्टाफने वरुणची ताकद आणि कंडिशनिंगसाठी चार्ट तयार केला आहे. हा दुखापत बरा करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्याला वेदना कमी करणारे इंजेक्शन देखील दिले जात आहेत जेणेकरून तो कोणत्याही अडचणीशिवाय चार ओव्हर गोलंदाजी करू शकेल. इंजेक्शन्समुळे ठराविक काळासाठी वेदना होत नाही. तुम्हाला हे टीव्हीवर दिसणार नाही पण गोलंदाजी करत नसताना त्याला वेदना होतात.”

चक्रवर्तीला क्षेत्ररक्षण करताना डाइव्ह न मारायचे सांगण्यात आले आहे. यासह, त्याला साईडला जाण्यापासून देखील प्रतिबंधित केले गेले आहे. पण वरुण टी-20 विश्वचषकापर्यंत हे करू शकणार आहे का? कारण केकेआरलाही त्याची गरज आहे आणि आयपीएल ही खूप कठीण स्पर्धा आहे. याबद्दल संघाचा एक वरिष्ठ खेळाडू म्हणाला, “चांगल्या कर्णधारांना फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजी माहित असलेल्या क्षेत्ररक्षकांना कसे लपवायचे हे माहित असते. वरुणला चार ओव्हर टाकण्याची गरज आहे. त्याने जड्डू (रवींद्र जडेजा) किंवा विराटसारखे क्षेत्ररक्षण करणे अपेक्षित नाही.”