IND vs SL 3rd T20I 2021: अंतिम सामन्यात अखेर श्रीलंकेने मारली बाजी, धवन ब्रिगेडला लोळवत 2-1 ने काबीज केली मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: तीन सामन्यांची वनडे मालिका गमावल्यावर कोलंबो (Colombo) येथे खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत यजमान श्रीलंकेने (Sri Lanka) दणदणीत पुनरागमन केले आणि तिसऱ्या व अंतिम सामन्यात शिखर धवनच्या भारतीय संघावर (Indian Team) 7 विकेट्सने मात करत 2-1 अशी मालिका जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीसह 8 विकेट्स गमावून फक्त 81 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकन संघाने 4 विकेट गमावून 14.3 ओव्हरमध्ये सामन्यासह मालिका देखील खिशात घातली. कर्णधार धवनसह भारताचे तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले तर यजमान संघासाठी बर्थडे बॉय वनिंदू हसरंगाने 4 विकेट्स घेत टीम इंडियाचे (Team India) कंबरडं मोडलं. भारतासाठी राहुल चाहरने (Rahul Chahar) 3 गडी बाद केले. दरम्यान, 2019 नंतर श्रीलंकन संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. (IND vs SL T20I 2021: श्रीलंका संघाने रचला इतिहास, शिखर धवनच्या युवा संघाचा पराभव करत भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कमाल)

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात धवन ब्रिगेडने 7 विकेट्सने विजय मिळवून मालिकेत आघाडी मिळवली. पण त्यानंतर एकही गोष्ट संघाच्या बाजूने पडली नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्याच्या संपर्कात आलेले तब्बल 8 खेळाडू आयसोलेट झाले. यामुळे संघाला मालिकेत मोठा फटका बसला आणि ते अननुभवी युवा खेळाडूंसोबत मैदानात उतरले. रुतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्क्ल, नितीश राणा आणि चेतन सकारिया यांनी भारताकडून टी-20 पदार्पण केले पण सर्व अपयशी ठरले. दुसरीकडे, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव देखील यंदा संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकेच्या विजयात फिरकीपटू वनिंदूं हसरंगाने संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने संपूर्ण मालिकेत एकूण 7 विकेट्स काढल्या.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वात मुख्य संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे यंदा शिखर धवनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. धवन ब्रिगेडने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली पण टी-20 मालिकेत संघाला कमाल दाखवता आली नाही आणि 1-2 अशी मालिका गमवावी लागली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकाविरुद्ध मालिका महत्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यामुळे आता लंकन दौऱ्यावरील मालिकेतील कोणत्या खेळाडूंना भारताच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.