
भविष्यात एसटीच्या (ST Bus) प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन लालपरी सह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडी टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञान वर आधारित (Anti-Theft Technology) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून, प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातीबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडी बाबत अपडेट राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरात प्रसिद्धीकरिता एलईडी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा: Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार)
सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून, बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तात्काळ विजवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, तसेच बस फेऱ्यांचा वक्तशीर पणा वाढवणे यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात खऱ्या अर्थाने एसटी स्मार्ट होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.