साईबाबा यांचं जन्मस्थळ 'पाथरी', ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर; ग्रामस्थ घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट!
Sai Baba | Photo Credits: Twitter

साईबाबा जन्मस्थळाबाबत निर्माण झालेला वाद हळूहळू निवळत आहे. आज परभणीतील पाथरी (Pathri) गावामध्ये ग्रामसभेत साईबाबा याचं जन्मस्थळ पाथरी असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान पाथरी गावाचं शिष्टमंडळ उद्या (22 जानेवारी) दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. दरम्यान याप्रकरणी समिती नेमण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे करण्यात आली आहे. साईबाबा जन्मस्थळाच्या वादात बीडकरांचीही उडी; साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा करत तीर्थक्षेत्रासाठी मागितला 100 कोटींचा निधी.

मागील काही दिवसांपूर्वी शिर्डी हे साईबाबांचं जन्मस्थळ नसून पाथरी हेच साईबाबा यांचं जन्मस्थळ असल्याचं सांगत शिर्डीवासियांनी बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान मुख्यमंत्री आणि शिर्डीवासियांनी बैठक घेऊन वाद मिटवला आहे. यावेळेस साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख न करता पाथरी तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिले होते. आता पाथरीच्या लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.

साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा बीडमधील साईभक्तांनी केला आहे. तसेच तीर्थक्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधीही साईभक्तांनी मागितला आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. त्यांनी बीडमध्ये नोकरी केली होती. असा दावा आज समोर आला आहे.