Swabhimani Shetkari Sanghatna: राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधान
राजू शेट्टी | (Photo Credit : Facebook)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील घटक पक्ष असलेला राजू शेट्टी (Raju Shetty) यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) वेगळा विचार करत असल्याची चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर येथे 5 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मविआमधून बाहेर पडल्यास स्वाभिमानी भाजपसोबतच युती करण्याच्या दिशेने पाऊल टाकते का याबाबत उत्सुकता आहे.

पाठीमागील काही दिवसांपासून राजू शेट्टी सातत्याने महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. एकदा तर त्यांनी कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? अशी तीव्र शब्दांतील टीकाही केली. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतो आहे. (हेही वाचा, US Parishad 2021: राजू शेट्टी यांचा प्लॅन काय? महाविकासआघाडीची साथ सोडणार? ऊस परिषदेत मोठं विधान, शरद पवार आणि भाजपवरही टीकास्त्र)

राजू शेट्टी यांनी अलिकडेच काही आंदोलन केली होती. शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध व्हावी. वीजकपात कमी करावी. थकीत विजबीलासाठी शेतकऱ्यांची वीज कापू नये यांसारख्या मागण्या घेऊन राजू शेट्टी यांनी आंदोलने केली आहेत. याच मागण्यांसाठी राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे 14 दिवस आंदोलनाला बसले. मात्र, राज्य सरकारकडून या आंदोलनाची विशेष दखल घेतली गेली नाही. राज्य सरकारची ही भूमिका राजू शेट्टी यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.