Rain Updates: मुंबई शहरासह जाणून घ्या राज्यभरातील पावसाची खबरबात; कुठे कसा बरसला वरुण राजा
Rain Updates | (Photo Credits: Twitter)

Rain Updates in Mumbai and all over Maharashtra: मुसळधार पावसाने मुंबई तुंबली. सर्व यंत्रणा ठप्प झाली. सहाजिकच प्रसारमाध्यमं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष राजधानीचं शहर म्हणून मुंबई शहरावर केंद्रीत झलं. पण, पावसाने केवळ मुंबईच नव्हे तर, उर्वरीत राज्यातही पावसाने हजेरी लावली. अर्थात, अद्यापही अनेक ठिकाणी दमदार पावसाची प्रतिक्षा असली तरी, राज्यातील काही भागात दमदार, मध्य तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. जाणून घ्या मुंबईसह राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसा राहिला पाऊस. ठळक मुद्दे.

मुंबई शहरात पावसाने आज कहर केला. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झालीच. पण, रस्त्यांवर आणि सकल भागात पाणी साचल्याने रस्तेवाहतूकही थांबली. अनेक घरं, गाड्यांमध्ये पाणी शिरले. एका ठिकाणी भिंत कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईतील पावसाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

उर्वरीत महाराष्ट्रात कसा राहिला पाऊस

जालना जिल्ह्यात सहा गावांचा संपर्क तुटला. ही सहा गावे भोकरदन तालुक्यात येतात. केळना नदीला पूर आल्याने सहा गावांचा तुटला संपर्क. आलापूर, उस्मानपेठ, गेकुळवाडी, भिवपूर, प्रल्हादपूर गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प. औरंगाबाद - जालना वाहतूकही ठप्प.

औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाची पाठ. मात्र, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. काही नद्यांना पूर, ओढे, नाले दुथडी भरले.

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची तुरळक हजेरी. भेडवळ येथे वीज केसळून एक महिला ठार तर तीन महिला जखमी. शेतकाम करत असताना घडली घटना. जखमी महिलांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2019: 'मुंबईकरांनो पुढील दोन तीन दिवस धोक्याचे, सांभाळून राहा' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

पालघर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाची दमदार हजेरी राहिली. त्याच्या परिणाम जनजीवन विस्कळीत होण्यात झाला. सफाळे, केळवे, मनोर, पालघर, बोईसर, चिंचणी, डहाणू येथे रस्त्ये, बाजारपेठा आणि नारिकांच्या घरात पाणी शिरले.