CM Uddhav Thackeray Live: महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही, अजून काही काळ बंधनं पाळणं गरजेचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

'हायकोर्टाने कडक लॉकडाऊनची विचारणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही, अजून काही काळ बंधनं पाळणं गरजेचे आहे' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray Live: महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही, अजून काही काळ बंधनं पाळणं गरजेचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती ही खूपच बिकट असून यातून बाहेर पडण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्यात कोरोनाची स्थिती, लॉकडाऊन, लसीकरण याबाबत काय स्थिती आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे (Facebook Live) संपर्क साधला. यात 'हायकोर्टाने कडक लॉकडाऊनची विचारणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही, अजून काही काळ बंधनं पाळणं गरजेचे आहे' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

तसेच 'राज्यात कोरोना रुग्णसंख्या ओसरली नाही मात्र रुग्णवाढीचा दर घटला असे त्यांनी सांगितले. 'संयम नसता तर स्थिती गंभीर झाली असती' असे सांगत सर्व जनतेने आणि कोविड योद्धांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे. हेदेखील वाचा- Coronavirus Vaccines: महाराष्ट्र शासन खासगी रुग्णालयांकडून परत घेणार कोविड-19 लस; राजेश टोपे यांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त

आज राज्यात 609 लॅब आहेत

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा

रुग्णसंख्या ओसरली नाही मात्र रुग्णवाढीचा दर घटला

गरज नसताना रेमडीसव्हीर वापरू नका

रोज पावणेतीन लाख कोरोना चाचण्या

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळवण्याचाप्रयत्न

गेल वर्ष ताणतणावाचं

पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व जम्बो कोविड सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

तिसरी लाट येणारच नाही याची खात्री देता येणार नाही

आतापर्यंत  1 कोटी 58 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. 'कोरोना चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. 12 कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी आहे.  मे महिन्यात 18 लाख डोस मिळणार आहे. परंतु लशींचं उत्पादन मर्यादित स्वरुपात होत आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका असे आवाहन मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जून ते जुलैमध्ये लशींचा साठा सुरळीत होईल असेही ते म्हणाले. राज्यातील आरोग्य सुविधा वाढवत आहोत. गेल्या वर्षी राज्यात 2 प्रयोगशाळा होत्या. राज्यात आतापर्यंत 609 प्रयोगशाळा वाढवल्या आहेत. सध्या राज्यात 5500 कोविड सेंटर उभारले आहेत. 11 हजार 713 वेंटिलेटर आपल्या राज्यात असून 28,937  आयसीयू बेड्स आहेत.

कोरोना लसीकरणासाठी प्रत्येक राज्यासाठी वेगळा अॅप तयार करा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कोविन अॅप क्रॅश होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2021 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).