महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020:  माजी खासदार राजू शेट्टी होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून आमदार
Sharad Pawar,Raju Shetty | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आता विधानपरिषद सदस्य होण्यास सज्ज आहेत. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बारामती येथील निवासस्थान गोविंद बाग येथे जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ झालेल्या बैठकीत शेट्टी यांना राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शेट्टी आणि पवार यांच्यात झालेल्या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे काही इतर नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवासस्थानी जाऊन राजू शेट्टी यांची नुकतीच (11 जून) भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. या भेटीत शेट्टी यांना विधान परिषदेवर जाण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र अंतिम निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यावरच होईल, असे बोलणे झाले होते. राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, आमची भेट झाली. मंत्री जयंत पाटील हे माझ्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आले होते. लोकसभेवेळी दिलेला शब्द पाळला जातोय की नाही याबाबत आपण प्रतिक्षा करत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले होते. दरम्यान, पवार यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2020: राजू शेट्टी यांना शरद पवार यांची ऑफर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निरोप घेऊन घरी)

दरम्यान, या वेळी विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. या सर्व जागा राज्यपाल नियुक्त आहेत. राज्यपाल नियुक्त जागांसाठी निवडणूक होत नाही. राज्य सरकार राज्यपालांना नावांची शिफारस करते. ती नावे स्वीकारायची किंवा नाही हे राज्यपाल ठरवतात. अपवाद वगळता राज्यपाल राज्य सरकारांच्या नावांची शिफारस नाकारत नाहीत. साहित्य, कला, विज्ञान, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तिमत्वांच्या अनुभवाचा फायदा राज्याला व्हावा या हेतूने ही निवड होत असते. राज्यपाल नियुक्त जागांसाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने शेट्टी यांच्या नावाची निवड केली आहे.