Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन नारायण राणे यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
Narayan Rane And Uddhav Thackeray (Twitter)

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याचे वृत सकाळपासून प्रसारमाध्यमांत झळकत होते. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यावरुन भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान ते म्हणाले की, ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. हत्येची आत्महत्या कशी करायची? यात हे सरकार माहिर आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्यासारखे गंभीर आरोप झाले आहेत. परंतु, ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचे काम सुरु आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत. याशिवाय, या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिले आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- Supreme Court On BJP, Congress: सर्वोच्च न्यायालयाची भाजपला चपराक, BMC विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेस पक्षाकडेच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सण लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरे करावे लागले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने अगामी शिवजयंती उत्सवासाठीही नियमावली आखून दिली आहे. यावर नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गंभीर आरोप असलेले संजय राठोड, आदित्य ठाकरे यांच्या समर्थनाच्या मोर्चासाठी परवानगी मिळते. मग शिवजयंतीला नियमावली का? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.