Mumbai | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) 24 जून 2025 ते 28 जून 2025 या कालावधीत सलग पाच दिवस अरबी समुद्रात मोठ्या भरतीच्या लाटा (High Tide Spell) येणार असून, या लाटांची उंची 4.75 मीटरपेक्षा जास्त असेल, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि भारतीय राष्ट्रीय सागर माहिती केंद्र (INCOIS) यांच्या अंदाजानुसार, या कालावधीत समुद्रात तीव्र लाटा उसळतील, ज्यामुळे किनारी भागात पूर येण्याचा धोका आहे. बीएमसीने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

बीएमसीच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने 24 ते 28 जून 2025 दरम्यानच्या उच्च भरतीच्या वेळा आणि लाटांच्या उंचीचा तपशील जाहीर केला आहे. या कालावधीतील सर्वात मोठी भरती 26 जून रोजी दुपारी 12:55 वाजता अपेक्षित आहे, ज्यावेळी लाटांची उंची 4.75 मीटरपर्यंत पोहोचेल.

या पाच दिवसांचा तपशील-

24 जून 2025: 11.15 वाजता, 4.59 मीटर उंचीची भरती.

25 जून 2025: दुपारी 12:05 वाजता, 4.71 मीटर उंचीची भरती.

26 जून 2025: दुपारी 12:55 वाजता, 4.75 मीटर उंचीची भरती (हंगामातील सर्वात मोठी).

27 जून 2025: दुपारी 1:40 वाजता, 4.73 मीटर उंचीची भरती.

28 जून 2025: दुपारी 2:26 वाजता, 4.64 मीटर उंचीची भरती.

इतर उंच लाटांच्या भरतीचा काळ 24-27 जुलै, 1-5 ऑगस्ट आणि 1-5 सप्टेंबर असा आहे. यावेळीही लाटांची उंची सातत्याने 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल. भरतीच्या काळात किनारपट्टीच्या भागात जाणे टाळण्याचा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला बीएमसीने नागरिकांना दिला आहे. विशेषतः मरीन ड्राइव्ह, वरळी सी फेस, जुहू बीच, आणि बांद्रा बँडस्टँड यांसारख्या किनारी भागात सतर्क राहणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Mumbai Lakes Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी 28 टक्क्यांपर्यंत वाढली; अजूनही पुरेशी नाही)

साधारण 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धोकादायक मानल्या जातात, कारण त्यामुळे गंभीर पूर येऊ शकतो, विशेषतः जेव्हा सखल भागात मुसळधार पाऊस पडतो. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान 19 जात उंचीच्या लाटांचे दिवस येण्याचा अंदाज आहे.