म्हाडा कडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रूपयांची मदत; रत्नागिरी मध्ये साकारणार 560 घरांची पोलिस  वसाहत
Image Used for Representational Purpose Only | Mumbai Police | (Photo credits: PTI)

रत्नागिरी (Ratnagiti) मध्ये पोलिस वसाहत उभी करण्यासाठी आता म्हाडा (MHADA) पुढाकार घेणार आहे. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीमध्ये 560 म्हाडा घरं उभारणार असल्याची माहिती दिली आहे. कोकणासह सांगली, कोल्हापूर शहराला मागील काही दिवसांपूर्वी पूराच्या पाण्याने वेढलं होतं. यामध्ये घराच्या डागडुजीसाठी म्हाडानेदेखील मदतीचा हात पुढे करत सुमारे 10 कोटी रूपयांचं अनुदान देणार असल्याची माहिती देखील म्हाडा कडून देण्यात आली आहे.

रत्नागिरीमध्ये म्हाडा पोलिसांकरिता 560 घरांची नवी वसाहत बांधनार आहे. ही घरं आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज असतील. लवकरच राज्यात इतर ठिकाणीदेखील राज्य सरकारची परवानगी मिळाल्यास घरं बांधली जातील असे म्हाडा कडून सांगण्यात आले आहे. लवकरच पालघर मध्ये विरार या ठिकाणी 520 अल्प उत्त्पन्न गट आणि पवईमध्ये 450 घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाईल असे संकेत म्हाडाकडून देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये लाखो कुटुंब बेघर झाली आहेत. सरकार, सामान्य, सेलिब्रिटी आणि समाजातील विविध स्तर मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये आता पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रूपयांची मदत म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत ही मदत आता गरजूंपर्यंत पोहचणार आहे.