Peepal Purnima Celebrated in Aurangabad: 'सात जन्मच काय 7 सेकंद सुद्धा अशी बायको नको'; औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरूषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा
पिंपळ प्रतिकात्मक फोटो (PC - Twitter)

Peepal Purnima Celebrated in Aurangabad: राज्यभारत मंगळवारी म्हणजेचं 14 जून रोजी वट पौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला अतिशय महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. विशेषत: विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत ठेवतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म तोच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, औरंगाबाद शहरात अनोखा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित पुरुषांनी आज पिंपळपौर्णिमा (Peepal Purnima) साजरी केली.

कदाचित ही बातमी वाचून तुम्हाला नवलं वाटेल. पण हे सत्य आहे. '7 जन्मच काय 7 सेकंद सुद्धा अशी बायको नको,' अशा घोषणा देत औरंगाबादमधील वाळूज परिसरातील पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पूजा केली. पूजन केले आहे. (हेही वाचा - Vat Purnima 2022 Date: वट पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व)

पिंपळ पौर्णिमा साजरी करणाऱ्या एका पुरुषाने सांगितले की, 'आमचं नेमकं दु:ख असं आहे की, आम्ही खूप आशेने लग्न केलं. मात्र, नंतर पत्नीसोबत झालेलं भांडण थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेलं. त्यानंतर पोलिस आमची मदत करत नाहीत. न्यायव्यवस्थाही आमची मदत करत नाही. पत्नी आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तर ती सुखाने जगू देत नाही.'

विशेष म्हणजे औरंगाबादच्या वाळूज भागात पत्नी पीडितांसाठीचा महाराष्ट्रातील पहिले आश्रम तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला सहा पुरुषांनी हे आश्रम सुरु केले. आता यातील सदस्यांची संख्या वाढत आहे. या आश्रमात दरवर्षी पत्नी पीडित पिंपळपौर्णिमा साजरी करतात.