महाराष्ट्रामधील तुरुंगातील 1043 कैदी आणि 302 कर्मचाऱ्यांना COVID19 ची लागण
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील तुरुंगातील 1043 कैदी आणि 302 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती राज्य तुरुंग विभागाकडून देण्यात आली आहे. तर तुरुंगातील सहा कैद्यांचा कोरोनामुळे बळी सुद्धा गेला आहे. दरम्यान, 818 कैदी आणि 271 जेलच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या काळात तुरुंगात सुद्धा त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून 10,480 कैद्यांना सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 2444 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले असून तर अन्य जणांना अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर बेलवर घरी पाठवण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाची सोमवार पर्यंतची आकडेवारी पाहता 8493 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 228 जणांना बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,04,358 वर पोहचला आहे. आरोग्य विभागाच्या मते, एकूण 11,391 रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4,28,514 जणांची प्रकृती सुधारली आणि 20,265 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 1,55,268 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुण्यात कोरोनाच्या आणखी 1829 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 82 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा आकडा सर्वाधिक असल्याचे ही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1,27,026 वर पोहचली आहे.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने जगभरातील संशोधक त्या संदर्भात अभ्यास करत आहेत. तर राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट अधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन एकत्रितपणे उठवण्यात येणार नाही. परंतु हळूहळू लॉकडाऊन उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.