महाराष्ट्र: लॉकडाउनमुळे राजस्थान मधील कोटा येथे गेल्या दीड महिन्यांपासून अडकलेले बुलढाणा जिल्ह्यातील 29 विद्यार्थ्यांची घर वापसी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र विविध राज्यात बहुसंख्येने कामगार वर्ग, विद्यार्थी आणि भाविक अडकून पडले आहेत. या अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परत जाता यावे यासाठी स्पेशल ट्रेन आणि बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच दरम्यान, आता राजस्थान मधील कोटा येथे गेल्या दीड महिन्यांपासून अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 29 विद्यार्थ्यांची घर वापसी झाली आहे.

महाराष्ट्रामधील 1780 विद्यार्थी कोटा येथे अडकले होते. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 29 एप्रिल रोजी बसेस रवाना करण्यात आल्या होत्या. त्या बसेस विद्यार्थ्यांना घेऊन परतल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रवास सुसह्य होण्यासाठी या बससोबत एक व्हॅन देखील पाठवण्यात आली होती.(पंजाब मधील लवली प्रोपेशनल युनिव्हर्सिटीत लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील 200 विद्यार्थी अडकले: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद: पहा व्हिडिओ)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेत त्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. तसेच राज्याच्या सीमा सुद्धा अद्याप बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र राज्याअंतर्गत उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली असून त्यावेळी सुद्धा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.