Maharashtra Government Formation: शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपुष्टात आला. त्यानंतर सुद्धा अद्याप राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. शनिवारी भाजप (BJP) पक्षाला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhgat Singh Koshyari) यांच्याकडून सत्ता स्थापनसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार भाजपच्या शिष्टमंडळाने कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापन करणार नसल्याची भुमिका स्पष्ट केली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्याची प्रथम संधी देण्यात आली. मात्र त्यांनी सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर आता शिवसेनेला (Shiv Sena) कोश्यारी यांच्याकडून सत्ता स्थापनासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोश्यारी यांच्याकडून संधी देण्यात आली आहे. तर उद्या संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यापूर्वी आकड्यांची जुळवाजुळ करावी लागणार आहे. त्यामुळे आता शिवसेना कशा पद्धतीने सत्ता स्थापनासाठी प्रयत्न करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत मिळून सत्ता स्थापन करणार का? त्याचसोबत काँग्रेस पक्ष शिवसेनेला समर्थन देणार का हे सुद्धा तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.(महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचाच होणार, संजय राऊत यांचा दावा)

ANI Tweet:

तसेच भाजपने आम्ही सत्ता स्थापनासाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्याबाजूला आता शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्याचसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बैठक बोलावली होती. शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होणार अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यामध्ये भाजपला 105, शिवसेना 56 जागांवर विजय मिळवता आला आहे.