Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

पुण्यामध्ये आज एनसीपी (NCP) चा वर्धापन दिन ( Sharad Pawar-led NCP Faction’s Foundation Day Event) साजरा होत असताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जाहीर भाषणामध्ये 'प्रदेशाध्यक्ष पदामधून' मुक्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवारांनी 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पद मला दिलं आहे आता नव्या चेहर्‍याला संधी देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. त्यामुळे जयंत पाटील आता प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर जाणार असल्याचे संकेत मिळताच काही काळ सभागृहामध्ये गोंधळ झाला. पवार साहेब यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं म्हणत जयंत पाटील यांनी भाषण संपवलं. आज पुण्यामध्ये दोन्ही एनसीपी कडून पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाचा सोहळा आहे. शरद पवारांकडून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लढाई तुकाराम विरूद्ध नथुराम

जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पक्षाच्या चढ उतारामध्ये दिलेल्या साथीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येऊ घातल्या आहे. या निवडणूकांना देखील महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाईल असं म्हटलं आहे. दरम्यान आता लढाई तुकाराम विरूद्ध नथुराम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही तुकाराम महाराज यांच्या विचारांचे आहोत. पण त्यांच्याच विचारांनुसार नाठाळ्यांचे माथी हाणू काठी नुसार कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी असं म्हटलं आहे. पराभवाची चर्चा करू नका असेही त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

जयंत पाटील शरद पवारांना राम राम करत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा देखील अनेकदा रंगली आहे. पण जयंत पाटीलांनी या चर्चांना फारसं महत्त्व दिलेलं नाही. नक्की वाचा: Maharashtra Politics: शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बैठकींबद्दल अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण; दोन्ही गट एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा नाही.  

रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या आहेत. दरम्यान आताही जयंत पाटील यांच्यावर पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. संघटनात्मक पातळीवर जयंत पाटील त्यांच्या जवळच्याच लोकांची नियुक्ती करतात असा आरोप जयंत पाटील यांच्यावर आहे. पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षण आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याची नाराजी युवा आमदारांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने आता शरद पवार पुढे काय निर्णय घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.