गडचिरोली: मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनी त्यांच्या घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी गडचिरोलीमधील आनंद नगर येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

वरगंटीवार या कटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी इतर नागरिकांच्या साहाय्याने हे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होते. शनिवारी रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. (हेही वाचा - नाशिक: कौटुबिंक वादातून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; 10 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी आपण आंतरजातीय विवाह करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यास रवींद्र वरगंटीवार यांनी नकार दर्शवला होता. दरम्यान, शनिवारी त्यांच्या मुलीने पळून जाऊन विवाह केला. ही बातमी समजल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.