Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी मुंबईमध्ये सुरु असलेल्या मतदानादरम्यान (Mumbai Lok Sabha Polls) निवडणूक आयोग टीकेचा धनी झाला आहे. मतदान केंद्रावरील मतदान (Election Commission of India) प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभाराहावा लागत आहे. मतदान केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मतदार वैतागले आहेत. निवडणूक आयोगाच्या दप्तरदिरंगाईमुळे निवडणूक आयोगावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा सांधला आहे. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने सोशल मीडिया मंच एक्स द्वारे एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे आणि मतदारांनाही आश्वासीत केले आहे.

निवडणूक आयोगाची एक्स पोस्ट

निवडणूक आयोगाने आपल्या एक्स पोस्टमध्ये मतदारांना आश्वासीत करताना म्हटले आहे की, ''मतदान केंद्रांवर संध्या. 06.00 वा. वाजता रांगेत उभे असतील असे सर्व मतदार आपला मताधिकार बजावू शकतील. मतदान केंद्रांवर संध्या. 06.00 वा. वाजता रांगेत उभे असलेले मतदार मताधिकार बजावेपर्यंत मतदान केंद्र कार्यरत राहतील''. (हेही वाचा, Election Commission of India : निवडणूक आयोगाकडून दाखल झालेल्या 425 तक्रारींपैकी 90% तक्रारींचे निराकरण; गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी जाहीर)

निवडणूक आयोग भाजपचा नोकर- उद्धव ठाकरे

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभार आणि मतदान केंद्रावरील दप्तरदिरंगाईवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे काम करणे अपेक्षीत आहे. पण असे असताना आयोग हा भाजपचा नोकर असल्यासारखे वर्तन करत आहे. मतदान अधिकप्रमाणावर होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेलाच विलंब लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना माझे अवाहन आहे की, कितीही वेळ लागला तरी आजचा दिवस संयम राखा. शांततेने मतदान करा. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही झाले तरी मतदान हे व्हायलाच पाहिजे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात जा. कितीही वेळ लागू द्या. मतदानाचा हक्क बजावा. सायंकाळी साहापर्यंत जोपर्यंत मतदार रांगेत आहेत तोपर्यंत निवडणूक आयोगाला मतदान घ्यावेच लागेल. त्यामुळे आपल्या हक्काशी एकनिष्ठ राहा. मतदानाचा हक्क बजावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी शिवसेना (UBT) पक्षास मतदान अधिक होण्याची शक्यता आहे. त्या भागात जाणीवपूर्वक प्रकियेत विलंब केला जात असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

एक्स पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांची टीका

दुसऱ्या बाजूला, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चार जूनला होणारा त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच त्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे त्यांनी रडगाणे सुरु केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.