Coronavirus: कोरोना रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण; महाराष्ट्रासह दहा राज्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय
Screening | (Photo Credits: Twitter)

देशभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महाराष्ट्र (Maharashtra) , गुजरात, राजस्थान अशी काही राज्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे वाढत्या कोरना व्हायरस रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रासह देशभरातील इतर 10 राज्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण (Door-To-Door Surveys) केलं जाणार आहे. एकूण 10 राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घेतली जाणार आहे. तसेच तातीडीने चाचणीही घेतली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की, या सर्वेक्षणामुळे कोरोना व्हायरस संसर्ग आणि मृत्यूदर रखण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होतील. आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांनी माहिती देताना सांगितले की, देशभरातील विविध 45 महापालिका अंतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालय अधिक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत सुदान यांनी सांगितले की, देशभरात लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे त्याबाबत राज्यांनी काटोकोर नियोजन करावे. (हेही वाचा, Coronavirus in India: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ, 9987 नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2,66,598 वर)

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार घरोघरी सर्वे केल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या 10 राज्यातील 38 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

जगभरातील देशांमध्ये असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता भारत आतापर्यंत सुरक्षीत समजला जात होता. मात्र 25 मे या दिवशी भारत कोरोना व्हायरस रुग्णसंख्येत टॉप 10 असलेल्या देशांमध्ये पोहोचला. सुरुवातीला भारत पहिल्या दहा देशांमध्ये 7 व्या स्थानावर होता. मात्र आता अवघ्या 13 दिवसांमध्ये भारत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे.