CM Uddhav Thackeray | (Photo Credit : Twitter)

मुंबई शहातील बॉम्बे डाईंग (Bombay Dyeing), श्रीनिवास मिल (Shrinivas Mill) येथे उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या 3850 घरांची लॉटरी येत्या 1 मार्चला निघणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच स्वत: ही घोषणा केली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी गिरणी कामगार कृती संघटनेचे एक शिष्टमंडळच आले होते. या शिष्ठमंडळात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर, दस्ता इस्वलकर, अन्णा शिर्सेकर, निवृत्ती देसाई, जयप्रकाश भिलारे, प्रवीणी घाग, नंदू पारकर, शिवाजी काळे, गोसावी बबन गावडे यांच्यासह गिरणी कामगार कृती संघटनेच्या इतरही काही नेत्यांचा समावेश होता.

दरम्यान, गिरणी कामगारांच्या शिष्ठमंडळाने मागणी केली की, इंडिया युनायटेड मिल क्रमांक 2 आणि 3 मधील जी जमीन गिरणी उद्योगाच्या म्युझियमसाठी राखून ठेवण्यात आली आहे. ती जमीन कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. शिष्ठमंडळाची ही मागणी ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, म्युझियम महत्त्वाचे आहे. परंतू, म्युझियमपेक्षा कामगारांची घरं महत्त्वाची आहेत. त्यामुळे एकूण जमीनीपैकी काही जमिन म्युझियमसाठी राखून ठेवण्यात यावी आणि उर्वरीत जमिनिवर गिरणी कामगारांसाठी घरं प्राधान्याने उभारण्यात यावीत. त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने काम करेन. (हेही वाचा,पनवेल: एमएमआरडीए 2500 घरांची लॉटरी 1 एप्रिलला काढणार )

दरम्यान, मुंबई शहरात आणि उपनगरात वापरात नसलेली सुमारे 70 एकर जमीन पडून आहे. त्या जमीनीची पाहणी करुन ती ताब्यात घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या जमीनीवर योग्य पद्धतीने वापर केला तर सुमारे 35 हजार घरे उपलब्ध होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.