Maharashtra: 'नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू' चंद्रकांत पाटील यांचा टोला
चंद्रकांत पाटील ( फोटो सौजन्य- गुगल)

दिल्लीत बुधवारी (8 जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर महाराष्ट्रातील कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राजमंत्रीपद मिळाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तसेच “मंत्रीमंडळ विस्तार करून काहीही फरक पडणार नाही. नुसते डबे बदलून फायदा नाही, इंजिन बदलायला हवे”, असं नाना पटोले म्हणाले होते. तसेच, मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधानच बदलायला हवेत, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली होती. यावर चंद्रकांत पटील म्हणाले की, “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- सुप्रिया सुळे यांनी घेतली स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांची भेट; विद्यार्थ्यांना केले 'हे' आवाहन

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने आणलेल्या जप्ती संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, “जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किंमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा अशी मागणी मी केली आहे. मी जे पत्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना दिले, ती कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी तयार केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.