Loksabha Election 2024: 'काँग्रेसची इतकी केविलवाणी स्थिती कधीच झाली नव्हती', सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन अशोक चव्हाण यांची टीका
Ashok Chavan | (Photo Credits: Facebook)

राज्यात आघाडी आणि युतीत जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत सांगली (Sangali Loksabha) आणि भिवंडी लोकसभेच्या (Bhiwandi Loksabha) जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena UBT) गटानं सांगलीच्या जागेवर दावा करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व त्यांच्या या दोन पारंपरिक जागा आपल्याकडे घेऊ शकलं नाही, असं म्हणत राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर (Congress Leader) टीका होत आहे. (हेही वाचा - Loksabha Election 2024: काँग्रेसला मोठा धक्का, प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश)

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपात दाखल झालेत. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्यामुळे चव्हाण यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला. काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. असे चव्हाण यांनी म्हटले.

सांगलीत काँग्रेस कमकुवत नाही तर पक्षाचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं. काँग्रेसच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक सांगली आणि भिवंडीच्या जागा सोडाव्या लागतात, यातून पक्षाचं नेतृत्व किती कमकुवत झालंय हे सिद्ध होतं. असे चव्हाण यांनी म्हटले.