Aasif Sheikh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Controversy over Aurangzeb: औरंगजेब हा इतिहासातला विषय असला तरी राजकीय फायद्या-तोट्याच्या गणितामुळे तो जीवंत आहे. दररोज कोणता ना कोणता राजकीय पक्ष, व्यक्ती, आमदार, खासदार त्याबाबत विधान करतो आणि राजकारण ढवळून निघते. आताही तसेच झाले आहे. मालेगाव (Malegaon) येथील माजी आमदार आसिफ शेख (Aasif Sheikh) यांनी औरंगजेब बादशाहबद्दल काही वक्तव्ये केली आहेत. त्यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. औरंगजेब हा पवित्र आणि प्रामाणिक होता. दोन वेळच्या जेवणासाठी तो टोपी विणून गुजारण करत असे, अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळली आहेत. मायनॉरिटी डिफेन्स कमिटी तर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात ते बोलत होते. शेख हे काँग्रेस तिकीटावर आमदार म्हणून निवडणून आले होते.

विधानावरुन वादाची चिन्हे

माजी आमदार आसिफ शेख हे औरंगजेब यास केवळ पवित्र आणि प्रामाणिक म्हणून थांबले नाहीत. त्यांनी तो एक सर्वधर्मसमभाव ठेवणारा आणि तितकाच त्या विचाराचे आचरण करणारा मनुष्य होता. आजच्या काळात त्याला केवळ राजकारण आणि राजकीय कारणांसाठी बदनाम केले जात, असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आज केवळ मते मिळविण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्याच्याकडे (औरंगजेब) बोट दाखवले जाते. त्यासाठी त्याला खलनायक ठरवायचे आणि समाजात ध्रुवीकरण करायचे प्रयत्न सुरु असतात, असेही आसिफ शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Aurangzeb’s Tomb Row: मुघल वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी मागितली UN ची मदत: Antnio Guterres यांना लिहिले पत्र)

विधानावर ठाम असल्याचे विधान

दरम्यान, मायनॉरिटी डिफेन्स कमिटी तर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात बोलताना आसिफ शेख यांनी आपल्या 'त्या' विधानाचे समर्थन केले. आजही मी त्या विधानावर ठाम आहे. आम्ही भारतीय संविधान मानणारे लोक आहोत. आम्ही देशावर प्रेम करतो, असेही ते म्हणाले.

आसिफ शेख हे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आहेत. पुढे त्यांनी आपला स्वतंत्र वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला. दरम्यान, मध्येच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्याकडून त्यांना 162 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

औरंगजेब याच्याबद्दल थोडक्यात

औरंगजेब (पूर्ण नाव: मुही-उद-दीन मुहम्मद औरंगजेब) याचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमधील दाहोद येथे झाला आणि मृत्यू 3 मार्च 1707 रोजी अहमदनगरजवळ झाला. तो मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांचा मुलगा होता. औरंगजेबने 1658 ते 1707 या कालावधीत मुघल साम्राज्यावर राज्य केलं—हे मुघल साम्राज्याचं सर्वात मोठं आणि दीर्घकाळ टिकलेलं राज्य मानलं जातं. त्याच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याने भारताच्या जवळपास संपूर्ण भागावर अधिराज्य गाजवलं, पण त्याचबरोबर त्याच्या धार्मिक कट्टरतेमुळे आणि कठोर धोरणांमुळे अनेक बंडखोरीही उद्भवल्या. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला.