प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ((AB PM-JAY) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत उत्पन्न विचारात न घेता, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा पुरवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे सहा (6) कोटी ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना कौटुंबिक तत्वावर 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

या मंजुरीमुळे, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती कशीही असो, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना एबी पीएम-जेएवाय  अंतर्गत नवीन विशिष्ट कार्ड दिले जाईल. एबी पीएम-जेएवाय योजनेत आधीच सहभागी असलेल्या कुटुंबातील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःसाठी प्रति वर्ष 5 लाखांपर्यंतचे अतिरिक्त सुरक्षा कवच मिळेल. 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक आधारावर प्रति वर्ष 5 लाखांपर्यंतचे संरक्षण मिळेल.

एबी पीएम-जेएवाय ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वित्तपोषित आरोग्य विमा योजना आहे, जी 12.34 कोटी कुटुंबांशी संबंधित 55 कोटी व्यक्तींना दुय्यम आणि तृतीयक काळजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुरक्षा कवच पुरवते. वय विचारात न घेता पात्र कुटुंबातील सर्व सदस्यांना योजनेत समाविष्ट केले जाते. या योजनेत 49 टक्के महिला लाभार्थीं असून 7.37 कोटी रूग्णालयांमध्ये दाखल होण्याची सुविधा आहे. या योजनेअंतर्गत जनतेला 1 लाख कोटीहून अधिक रकमेचा फायदा झाला आहे.

70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2024 मध्ये केली होती. एबी पीएम-जेएवाय योजनेमुळे लाभार्थीची संख्या सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला, 10.74 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबे ज्यात भारतातील तळाच्या 40% लोकसंख्येचा समावेश आहे, त्यांना योजनेअंतर्गत सामील करून घेण्यात आले. (हेही वाचा: Delhi Air Pollution: खराब हवेमुळे तब्बल 8 वर्षांनी कमी होत आहे दिल्लीकरांचे आयुष्य; अहवालातील धक्कादायक खुलासा)

नंतर, भारताच्या 2011 च्या लोकसंख्येच्या तुलनेत मागील दशकात झालेली 11.7% लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन, केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये, एबी पीएम-जेएवाय अंतर्गत लाभार्थी संख्या 10.74 कोटींवरून 12 कोटी कुटुंबांपर्यंत नेली. देशभरात कार्यरत 37 लाख ASHA/AWW/AWH आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळावा यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करण्यात आला.  आता एबी पीएम-जेएवाय योजना देशभरातील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करेल.