Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जोपर्यंत राज्याच्या राजकारणात आहेत, तोपर्यंत या राज्यास कायदा व सुव्यवस्था आणि सुखशांती लाभणार नाही, असा घणाघात शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना संपादकीय (Saamana Editorial) लेखातून करण्यात आला आहे. नागपूर ऑडी हिट अँड रन (Nagpur Audi Hit-and-Run Case) प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत याचे नाव आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या संशयास्पद वर्तनावरुनही जोरदार टीका होत आहे. त्यावरुन राज्य सरकारने 'चिरडा व पळा' ही योजना सुरु करुन 'हिट अँड रन' प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी, अशी योजना सुरु करायला काय हरकत आहे? असा सवालही सामना संपादकीयातून उपस्थित करण्यात आला आहे.

'राज्यात भ्रष्टाचारास खुली सुट'

महाराष्ट्र हे राज्य एकेकाळी देशभरामध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी ओळखले जात असे. मात्र, आता ते चित्र राहिले नाही. राज्यात भ्रष्टाचारास खुली सुट दिल्याने आणि कायदा विकत घेण्याची नवी पद्धत सुरु झाल्याने असे घडत असल्याचा आरोप दैनिक सामनातून करण्यात आला आहे. याच संपादकीयात पुढे म्हटले आहे की, 'बडे बाप के बेटे' महागड्या गाड्यांनी सामान्य नागरिकांना चिरडून पसार होतात आणि त्यांचे 'सागर' बंगल्यावरील बॉस या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी मदत करतात. सामान्य माणसे मात्र रस्त्यावर तडफडून मरतात. असा हा राज्यातील सध्याचा ताळेबंद आहे, असे म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करण्यात आली आहे. (हेही वाचा, Saamana Editorial on CM Eknath Shinde: 'गद्दार हृदयसम्राटांकडे भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'सामना'तून प्रहार)

रश्मी शुक्ला यांच्यावरही जोरदार टीका

दरम्यान, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावरही जोरदार टीकास्त्र डागण्यात आले असून, त्यांच्याकडून न्यायाची कोणतीच अपेक्षा करता येणार नाही. कारण, त्यांचे त्या आरोपींच्या 'ताई-माई' वेच्यारिकदृष्ट्या बनल्या असल्यामुळे त्या नात्यात बांधल्या गेल्या आहेत. राज्यातील मिंधे सरकार हातावर हात ठेऊन बसले आहे. राज्यातील मंत्र्यांचे बंगले हे थेट गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी न्याय मागण्यासाठी जायचे कोठे? असा थेट सवाल सामना संपादकीयातून विचारण्यात आला आहे. (हेही वाचा, Saamana Editorial on Eknath Shinde Fiction: 'मिंधे गटाचा बाप गुजरात किंवा दिल्लीत असावा', दैनिक सामना संपादकीयातून जोरदार टीकास्त्र)

नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचे नाव आले आहे. पोलिसांचा दावा आहे की, अपघात घडला तेव्हा संकेत हा त्या कारमध्ये होता. मात्र, तो वाहन चालवत नव्हता. दुसराच कोणीतरी व्यक्ती कार चालवत होता, असे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन राजकारण तापले असून पुढे काय हाती लागते याबाबत उत्सुकता आहे.