
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राने अनेक यशस्वी टप्पे गाठले असले, तरी काही भयंकर विमान दुर्घटनांनी या क्षेत्राला हादरे दिले आहेत. आज, 12 जून 2025 रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad Plane Crash) सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेली एअर इंडिया फ्लाइट AI171, एक बोईंग 787-8 ड्रीमलाइनर, उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत मेघनीनगर परिसरात कोसळली. या दुर्घटनेत 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी केवळ 1 व्यक्ती वाचली आहे. स्थानिक रहिवाशांनाही जीवितहानी झाली आहे. ही घटना भारतातील सर्वात घातक हवाई दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताच्या हवाई वाहतूक इतिहासातील काही सर्वात विनाशकारी दुर्घटनांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे, ज्यांनी देशाला शोकाकुल केले आणि हवाई सुरक्षेच्या सुधारणांना चालना दिली.
भारतातील प्रमुख विमान दुर्घटना-
एअर इंडिया फ्लाइट 182 (1985)-
23 जून 1985 रोजी, एअर इंडियाचे बोईंग 747-237B, फ्लाइट 182, मॉन्ट्रियलहून लंडन आणि नंतर दिल्लीकडे जात असताना, आयर्लंडजवळ अटलांटिक महासागरात दहशतवादी बॉम्बस्फोटामुळे कोसळले. या दुर्घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले, ज्यात 268 कॅनेडियन आणि 24 भारतीयांचा समावेश होता. ही भारताच्या हवाई वाहतूक इतिहासातील सर्वात घातक दुर्घटना आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर विमानतळ सुरक्षा आणि सामान तपासणीच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा झाल्या.
चरखी दाद्री हवाई टक्कर (1996)-
12 नोव्हेंबर 1996 रोजी, दिल्लीजवळ चरखी दाद्री येथे सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या बोईंग 747-168B आणि कझाकस्तान एअरलाइन्सच्या इल्यूशिन Il-76 यांच्यात हवेत टक्कर झाली. या घटनेत दोन्ही विमानांतील 349 प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले. हवाई वाहतूक नियंत्रणातील त्रुटी आणि पायलटच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. यानंतर भारतात रडार आणि हवाई नियंत्रण यंत्रणेत सुधारणा करण्यात आल्या.
एअर इंडिया फ्लाइट 855 (1978)-
1 जानेवारी 1978 रोजी, एअर इंडियाचे बोईंग 747-237B, फ्लाइट 855, मुंबईहून दुबईला जात असताना, उड्डाणानंतर काही मिनटांत अरबी समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत 213 प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले. यांत्रिक बिघाडामुळे पायलटने विमानाचे नियंत्रण गमावले, असे तपासात आढळले. यामुळे विमान देखभाल आणि पायलट प्रशिक्षणावर अधिक कडक नियम लागू झाले.
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 (2010)-
22 मे 2010 रोजी, एअर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग 737-8HG, फ्लाइट 812, दुबईहून मंगलोरला येत असताना, मंगलोर विमानतळावर धावपट्टीवरून घसरले आणि खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत 158 प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले, तर 8 जण वाचले. पायलटची चूक आणि प्रतिकूल हवामान यामुळे ही घटना घडली. यानंतर धावपट्टी सुरक्षा नियमांमध्ये बदल करण्यात आले.
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX1344 (2020)-
7 ऑगस्ट 2020 रोजी, एअर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग 737-800, फ्लाइट IX1344, दुबईहून कालिकत (कोझिकोड) येत असताना, कालिकत विमानतळावर धावपट्टीवरून घसरले आणि खणीत पडले. या दुर्घटनेत 21 प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले, तर 169 जखमी झाले. पावसाळी हवामान आणि पायलटच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. यामुळे धावपट्टीच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली.
अलायन्स एअर फ्लाइट 7412 (2000)-
17 जुलै 2000 रोजी अलायन्स एअर फ्लाइट 7412 पाटण्याच्या एका निवासी वसाहतीत कोसळले. विमानात 55 जणांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर 5 जणांचा मृत्यू झाला.
इंडियन एअरलाइन्स (1988)-
पायलटच्या चुकीमुळे इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 113 अहमदाबाद विमानतळावर जाण्याच्या शेवटच्या टप्प्यात कोसळले. यामध्ये 130 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना Tata Group देणार 1 कोटींचे आर्थिक साहाय्य)
दरम्यान, भारतातील विमान दुर्घटनांमागे यांत्रिक बिघाड, पायलटच्या चुका, प्रतिकूल हवामान, दहशतवादी हल्ले आणि हवाई वाहतूक नियंत्रणातील कमतरता ही प्रमुख कारणे आढळली आहेत. या प्रत्येक दुर्घटनेने हवाई सुरक्षेच्या क्षेत्रात सुधारणांची गरज अधोरेखित केली. उदाहरणार्थ, 1985 च्या फ्लाइट 182 नंतर सामान तपासणी आणि विमानतळ सुरक्षा वाढवण्यात आली, तर 1996 च्या चरखी दाद्री दुर्घटनेनंतर हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत सुधारणा झाल्या.