Nirbhaya Case Hearing: सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ऐन सुनावणीच्या दिवशी का घेतली माघार? वाचा सविस्तर
Justice Sharad Arvind Bobde (Photo Credits: Supreme Court website)

Nirbhaya Case Hearing: दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे (Chief Justice Sharad Bobde) यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार होते, परंतु  त्यांनी या सुनावणीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

या खंडपीठात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस आर. भानुमती या न्यायाधीशांचा समावेश होतं. परंतु, शरद बोबडे यांनी माघार घेतली असल्याने, आता बुधवारी नवं खंडपीठ तयार करण्यात येणार आहे.

माघार घेण्याचे कारण सांगताना शरद बोबडे म्हणाले की या आधी पीडीत कुटुंबीयाच्या वतीने ज्या वकिलांनी युक्तिवाद केला होता ते त्यांचे नातेवाईक आहेत. म्हणूनच या प्रकरणात बोबडे यांना सुनावणी करणं योग्य वाटत नाही.

निर्भया प्रकरण: फाशीच्या शिक्षेमुळे चारही आरोपी डिप्रेशनमध्ये; जेवण झालं कमी!

दरम्यान, डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर, बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर विनय, पवन आणि मुकेश या आरोपींनी फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. परंतु, कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावल्या व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. आता, तशीच याचिका आरोपी अक्षय याने दाखल केली. गुन्ह्यामध्ये आरोपींना आजही शिक्षा मिळत नसल्याने, अनेकांमध्ये असं मत झालं आहे की, फाशीच्या शिक्षेच्या अंलबजावणीला विलंब व्हावा यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आली आहे.