Go First Flight Forgets Passengers: 50 प्रवाशांना खालीच विसरुन 'विमान उडाले आकाशी', DGCA ने मागवला अहवाल
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

एकदोन नव्हे तर चक्क 50 प्रवाशांना खालीच विसरुनगो फर्स्ट (Go First) कंपनीच्या विमानाने आकाशात उड्डाण केले. बंगळुरु येथे हा प्रकार घडला. विमानात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना डांबरी रस्त्यावर बसमध्येच सोडून विमान आकाशात झेपावलेच कसे. क्रू मेंबर्स, पायलट आणि व्यवस्थापन नेमके काय करत होते, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation) अर्थातच डीजीसीए (DGCA) याबाबत अहवाल मागवला आहे.

डीजीसीएने घडल्या प्रकाराबद्दल सांगितले की, आम्हाला या घटनेबद्दल माहिती मिळली आहे. आम्ही संबंधित कंपनीकडे अहवाल मागवला असून, त्यावर काय कारवाई करायची याबाबत आमचा विचार सुरु आहे. दरम्यान, या घटनेची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेल्या प्रेक्षकांनी मात्र, सोशल मीडियाव आपले अनुभव कथन केले आहेत. काही प्रवाशांनी हा अत्यंत विचित्र आणि भयानक अनुभव होता असे म्हटले आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बेंगळुरूहून दिल्लीला जाण्यासाठी G8 116 या विमानाने सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Kempegowda International Airport) उड्डाण केले. तत्पूर्वी विमानात चढण्यासाठी प्रवाशांना चार बसमधून नेण्यात आले. दरम्यान, तीन बसमधील प्रवासी विमानात चढले आणि विमानाने उड्डाण भरले. दरम्यान, एक बस खालीच राहिली आणि त्या बसमधील 55 प्रवासी विमान हवेत झेपावताना केवळ पाहात राहिले. ज्या प्रवाशांसोबत हा धक्कादाय प्रकार घडला त्यांनी , एअरलाइन, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला टॅग करत तक्रारी केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सर्व प्रवाशांकडे बोर्डिंग पास होते. त्यांच्या बॅगाही तपासण्यात आल्या होत्या. गो फर्स्ट एअरवेजने प्रवाशांच्या ट्विटला प्रतिसाद देत म्हटले की, "आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत."