BMC Election 2022: उत्तर प्रदेशच्या निकालाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम होईल काय?
BMC | (File Photo)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Elections 2022) भारतीय जतना पक्ष (BJP) मोठ्या प्रमाणावर यश मळवतो आहे असे दिसते आहे. अद्याप निर्णायक निकाल समोर आला नाही. तरीही हाती आलेले कल जनमत भाजपच्या बाजूने दिसतो आहे. त्यामुळे भविष्यातील विविध राज्यांमधील राजकारण कसे असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राजकारण आणि नजिकच्या काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) काय होऊ शकेल? असा प्रश्न विचारला जातो आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये पंजाब वगळता भाजप जोरदार यशस्वी होतो आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप अधिक आक्रमक प्रचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकाचे विचार करता मुंबई हे एक बहुभाषक शहर होऊन बसले आहे. त्यात प्रामुख्याने हिंदी भाषा बोलणारा उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये राहतो. यातील बहुतांश मतदार हा उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून येतो. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसते आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करील. उत्तर भारतीय मतदाराने जर भाजपला मदत केली तर मुंबई महापालिकेतील राजकीय चित्र कसे असेल याबातब लोक तर्कवितर्क व्यक्त करु लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या निकालाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम होईल काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Elections Results 2022: प्रियंका गांधी यांनी काम करुनही उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, काय असतील कारणे?)

दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.