Bharat Forecast System

भारताने 26 मे 2025 रोजी एका महत्त्वाकांक्षी आणि स्वदेशी हवामान अंदाज प्रणालीचे उद्घाटन केले, ज्याचे नाव आहे ‘भारत फोरकास्ट सिस्टीम’ (Bharat Forecast System- BFS). ही प्रणाली भारतीय हवामान खात्याने (IMD) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केली असून, पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) याची निर्मिती केली आहे. या प्रणालीद्वारे भारताने हवामान अंदाजामध्ये जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे, कारण ही जगातील सर्वात उच्च रिझोल्यूशन (6 किमी) असलेली हवामान मॉडेल प्रणाली आहे. मान्सूनचा अचूक अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि पाणी व्यवस्थापन यासाठी ही प्रणाली क्रांतिकारी ठरणार आहे.

भारत फोरकास्ट सिस्टीम ही पूर्णपणे स्वदेशी आहे. याच्या उच्च रिझोल्यूशनमुळे लहान स्तरावरील हवामान घटनांचा अंदाज, जसे की मुसळधार पाऊस, चक्रीवादळे आणि पूर, अधिक तपशीलवार आणि अचूकपणे लावता येईल. ही प्रणाली आयआयटीएम, पुणे येथील ‘अर्क’ सुपरकम्प्युटरद्वारे चालवली जाते. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती अगदी पंचायत स्तरापर्यंत स्थानिक अंदाज प्रदान करते. यामुळे गावागावांतील शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना तातडीने उपाययोजना करता येतील. याशिवाय, ही प्रणाली ओपन-एक्सेस आहे, ज्यामुळे जागतिक हवामान संशोधक आणि संस्थांना याचा वापर करता येईल.

Bharat Forecast System: 

आयआयटीएमने 2022 पासून या प्रणालीची प्रायोगिक चाचणी केली असून, त्यातून मिळालेल्या माहितीमुळे मान्सून, चक्रीवादळ आणि अति पावसाच्या अंदाजात 30 ते 64 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. नवीन प्रणालीमध्ये उत्तम रिझोल्यूशन आणि भौगोलिक कव्हरेज असेल. हे रिझोल्यूशन भारतात आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मागील 12-किमी ग्लोबल फोरकास्ट सिस्टमच्या (GFS) च्या तुलनेत प्रगत आहे. भारत फोरकास्ट सिस्टीममुळे स्थानिक पातळीवरील अंदाज अधिक विश्वासार्ह होतील. (हेही वाचा: Kerala Ship Sinking: केरळच्या समुद्रात लिबेरियन जहाज बुडाले; कंटेनर किनाऱ्यावर, किनारी भागात हाय अलर्ट)

याशिवाय, शेतीसाठी पिकांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि विमान वाहतूक यासारख्या क्षेत्रांना या प्रणालीचा मोठा फायदा होईल. या प्रणालीमुळे आपत्ती व्यवस्थापनात मोठी सुधारणा होईल. केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ही प्रणाली भारताच्या आत्मनिर्भरतेचे आणि जागतिक हवामान संशोधनातील नेतृत्वाचे प्रतीक आहे. ही प्रणाली भारतातील प्रत्येक गावापर्यंत हवामान माहिती पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे ‘हर घर मौसम’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. यामुळे सामान्य नागरिकांना देखील हवामान बदलांचा सामना करण्यासाठी तयारी करता येईल.