मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या अशोक खरात व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत पोहोचले असून सत्य दडपण्यासाठी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा दावा रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र राजकीय फायद्यासाठी कोणाचा बळी दिला जात असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'खरातला संपवण्याचा आणि व्ही के सिंगला वाचवण्याचा प्रयत्न'
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, "अशोक खरातकडे अनेक बड्या नेत्यांची महत्त्वाची माहिती आहे. त्याचे धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने, आता खरातला आत्महत्या किंवा इतर काही कारण दाखवून संपवण्याच्या चर्चा सुरू आहेत." दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पूर्ण माहिती असलेल्या व्ही के सिंग यांना कोणत्याही परिस्थितीत वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
सत्य दडपण्याचा अट्टहास का?
राजकीय रणनीतीचा भाग म्हणून जर कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा कोणाला जाणीवपूर्वक वाचवले जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. "सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का केला जात आहे? अशाने सत्य कधीच लपत नाही, ते उशिरा का होईना बाहेर येतेच," असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्य जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
खरात प्रकरणातील व्हिडिओ आणि त्यातील दाव्यांमुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच रोहित पवार यांनी थेट नाव घेऊन केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी खरात याच्याकडे नेमकी कोणती माहिती आहे आणि त्याचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे आता या प्रकरणाच्या तपासातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी, पण तपासाच्या नावाखाली राजकीय सूडबुद्धीने किंवा स्वार्थासाठी कोणाच्या जिवाशी खेळू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणात आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.