Maharashtra Assembly Elections 2019: गणेशोत्सवानंतर लागू होणार आचारसंहिता, 15 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार विधानसभा निवडणुक: सुधीर मुनगंटीवार यांचा अंदाज
Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

नागपूर: महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Electrions)  बिगुल वाजताच भाजप (BJP) सह शिवसेना (Shivsena) व अन्य पक्ष प्रचाराच्या कामात गुंतले आहेत.  अशातच विधानसभा निवडणुकीच्या बाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी अंदाज वर्तवत राज्यात गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागू होईल व साधारण 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकांसाठी मतदान पार पडेल अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा सज्ज आहे व जागांच्या वाटपासाठी सध्या परीक्षण सुरु आहे, यानुसार कोणती जागा शिवसेनेला द्याची, कोणत्या जाहगी कोणता उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक आहे हे पहिले जाईल आणि त्यानुसार निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), अमित शहा (Amit Shah) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी मिळून घ्यायचा आहे असे देखील मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची मुदत ही 9 नोव्हेंबर पर्यंत असल्याने सह्दर्णपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती. मात्र या कालावधीत राज्यातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव असल्याने आचारसंहिता निदान 12 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र दिवाळीच्या आधी मतदान होणार हे निश्चित असल्याचे समजत आहे. (शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणे यांच्या पक्षाचं विलिनीकरण करणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

दरम्यान 2014 मधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक तपासल्यास तेव्हा देखील अनंत चतुर्दशी नंतर 12 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होऊन मतदानाच्या दिवसाची घोषणा झाली होती तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान घेऊन 19 ऑक्टोबर पर्यंत मतमोजणी पार पडली होती. या वेळेस देखील निवडणुकांच्या तारखा साधारण याच कालावधीत असणार आहेत असा अंदाज मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा गणेशोत्सवानंतर घोषित होणार अशा चर्चा सुरु होत्या, ज्याला मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेल्या अंदाजमुळे आणखी खतपाणी मिळाले आहे.