नाशिक: कौटुबिंक वादातून महिलेने पोलिस ठाण्यासमोर घेतलं स्वत:स पेटवून
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नाशिकमध्ये (Nashik) कौटुबिंक वादातून एका महिलेने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्याबाहेर या महिलेने स्वत: ला पेटवून घेतलं आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत महिला 25 टक्के भाजली आहे. आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील टकले नगर येथील अमनप्रित संधू (वय, 27) हिचं गेल्या महिन्यात छत्तीसगडमधील राजिंदर पाड्डा याच्याशी लग्न झालं होतं. हे लग्न अमनप्रितच्या इच्छेविरुद्ध लावून देण्यात आलं होतं. अमनप्रित आणि तिच्या पतीचे नेहमी वाद होत असतं. अमनप्रितला पतीकडून शिवीगाळ आणि मारहाण होऊ लागली. त्यामुळे तिने पतीचं घर सोडलं आणि ती तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली. तिने पतीसोबत तसेच आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. मुलगी आपलं ऐकत नाही हे पाहून तिच्या आईने पोलिस ठाण्याबाहेर आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. (हेही वाचा - ठाणे: वजन कमी करण्याच्या गोळया घेतल्यानंतर तरुणीचा मृत्यू; 10 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

या घटनेत अमनप्रितची आई 25 टक्के भाजली आहे. सध्या अमनप्रितच्या आईची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पंटवटी पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आज हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळ व्यक्त करत आहे.