Maharashtra Weather Update: पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तथापी, किरकोळ तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना मोठ नुकसान सहन कराव लागू शकतं. (हेही वाचा - Water Supply Cut In Mumbai: 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील 12 वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद)

दरम्यान, राज्यातील विविध भागात वेगवेगळं वातावरण आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, मका या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्रात ही लाट अधिक प्रमाणात असेल. तसेच मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते. बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.