वर्धा: बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्याने विद्यार्थिनीची हाताची नस कापून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

वर्धा (Vardha) येथील एका बारावी बोर्ड परिक्षा (HSC Board Exam) दिलेल्या विद्यार्थिनीला कमी गुण मिळाल्याच्या नैराश्याने हाताची नस कापून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर एका झुडपे असलेल्या जंगलात या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे.

समीक्षा बोकडे असे या मुलीचे नाव आहे. समीक्षा ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. तसेच तिला अधिकारी बनण्याचे स्वप्न बागळले होते. परंतु बारावीचा निकाल जाहीर झाल्याने तिला 52 टक्के मिळल्याने ती निराश झाली होती. त्यानंतर 30 मे रोजी दुपारी घरातून अॅडमिशन घेण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र संध्याकाळ झाली तरीही समीक्षा घरी न आल्याने घरतील मंडळींनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली.(वर्धा: विज्ञान शाखेत समाधानकारक गुण न मिळाल्याने बारावी बोर्डाच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या)

त्यानंतर समीक्षा हिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिचा मृतदेह पुलगावावरुन जाणाऱ्या महामार्गावरील एका झुडपांच्या जंगलात आढळून आला. त्यावेळी समीक्षा हिने हाताची नस कापून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.