
हुंड्याचा (Dowry) सामाजिक दुष्प्रभाव सामान्यतः ग्रामीण भागात प्रचलित असल्याचे मानले जाते, मात्र आता पोलिसांच्या आकडेवारीनुसार मुंबई आणि पुणे सारख्या शहरी भागातही ही चिंताजनक प्रवृत्ती (Urban Dowry Harassment Cases) दिसून येत आहे. पुण्यात वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी छळ व त्यानंतर तिची आत्महत्या यानंतर हा मुद्दा अधिक गंभीररीत्या समोर आला आहे. मुंबईत 2024 मध्ये हुंड्यासाठी छळाचे 438 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 414 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला. जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान 163 गुन्हे दाखल झाले आणि 130 गुन्ह्यांचा तपास झाला. अहवालानुसार, पुण्यात 2024 मध्ये 250 हुंडा छळाची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यापैकी 210 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला.
गेल्या वर्षी मुंबईत हुंड्याशी संबंधित 11 आत्महत्यांचे गुन्हे दाखल झाले होते आणि त्यापैकी नऊ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत अशा पाच प्रकरणांची नोंद झाली. 2024 मध्ये मुंबईत आठ हुंडाबळी प्रकरणे नोंदवण्यात आली आणि सात उघडकीस आली. जानेवारी ते एप्रिल दरम्यान, एक हुंडाबळी प्रकरण दाखल करण्यात आले होते, जे सोडवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, याआधी हुंडाबळीशी संबंधित खून नोंदवण्यात आला होता, तर या वर्षी आतापर्यंत असा एकही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. कायदा लागू करण्याचा उद्देश अशी घृणास्पद प्रथा कमी करणे किंवा त्यावर बंदी घालणे हा होता. मात्र, कठोर वास्तव असे आहे की, ही वाईट प्रथा अजूनही अस्तित्वात आहे आणि उच्चवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांमध्ये ती दुर्दैवाने दिसून येते. कार्यकर्त्या आणि अधिवक्ता आभा सिंग म्हणाल्या, ‘हुंडा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे कारण, हुंडा हे एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे. पुण्यात, उपमुख्यमंत्र्यांनी वैष्णवीच्या लग्नात गाडीची चावी दाखवून तिला देण्यात आली. मात्र आपण हुंडा नाकारला पाहिजे.’ याबाबत त्यांनी सोशल मीडिया आणि सामाजिक दबावाला दोष दिला व डेस्टिनेशन वेडिंग आणि पंचतारांकित ठिकाणी समारंभ आयोजित करण्याचे वेड, अधोरेखित केले. या दबावांमुळे, लग्नाचा खर्च वाढला आहे आणि लोक भव्य गाड्या आणि भरपूर सोन्याचा दिखावा करू लागले आहेत. यामुळेच हुंडा प्रकरणांमध्ये वाढ होते, असे त्या म्हणाल्या. (हेही वाचा: Woman Gives Birth On Road: जळगावमध्ये आदिवासी महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म; Rohini Khadse यांची सरकार आणि आरोग्य विभागावर टीका)
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, हुंड्याशी संबंधित कारणांमुळे लाखो महिलांचा मृत्यू होत असूनही, आरोपींना दोषी ठरवण्याचे प्रमाण केवळ 30% आहे. यावरून असे दिसून येते की, बहुतेक प्रकरणांमध्ये, पती आणि त्यांचे कुटुंबीय मोकळे होतात, कारण पोलीस भ्रष्टाचारामुळे केस कमकुवत करतात. केसेसमध्ये पुरावा नसतात, किंवा खटले लांबतात. असेही म्हटले जात आहे की हुंडा कायद्याचा गैरवापर होत आहे, परंतु कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की केवळ 2% प्रकरणे खोटी आहेत. आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की केवळ हुंडा मागणाऱ्यांवरच नाही तर हुंडा देणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, हुंडा ही बाब मूळतः वधूच्या कुटुंबाकडून स्वेच्छेने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू होत्या, मात्र आता ही गोष्ट एक हानिकारक मागणी बनली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागांमध्ये, जिथे आधुनिकता आणि शिक्षणाचा प्रभाव आहे, तिथेही हुंडा छळाची प्रकरणे वाढत आहेत. हुंडा छळामध्ये मानसिक त्रास, शारीरिक मारहाण, आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्या किंवा हत्या यांचा समावेश आहे.हुंडा छळामुळे अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. शहरी भागात, जिथे शिक्षण आणि नोकऱ्यांमुळे महिलांची प्रगती होत आहे, तिथेही हुंड्यासारखी प्रथा त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा आणते.