Sanjay Raut On Rahul Gandhi: आणीबाणी हा विषय आता कालबाह्य, पुन्ह: पुन्हा दळण का दळायचे? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut Rahul GandhiNarendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आणीबाणी (Emergency) हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता', असं विधान काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरुन संजय राऊत यांनी दैनिक सामना दैनिकात रोखठोक या सदरात लेख लिहीला आहे. या लेखात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या विधानावरुन केंद्र सरकार आणि देशातील स्थितीवर जोरदार भाष्य केले आहे.

काय म्हटले आहे रोखठोक सदरात?

  • आणीबाणीचा विषय आता कालबाहय़ झालेला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीत निरपराध लोकांना जो त्रास झाला, कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत लोकांना जो जुलूम सहन करावा लागला त्याबद्दल खेद प्रदर्शित केला. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप बसविण्यात चूक झाली असे जाहीरपणे कबूल केले आणि पुन्हा आणीबाणी आणणार नाही असे वचनही दिले होते, पण तरीसुद्धा त्यांनी अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आपण चूक केली असा पश्चात्ताप मुळीच केला नाही, (हेही वाचा, Shiv Sena Leader Sanjay Raut on Rahul Gandhi about emergency statement and criticizes on Pm Narendra Modi Indira Gandhi Emergency)
  • देशाला अराजकतेपासून वाचविण्यासाठी त्यावेळी आणीबाणी जाहीर करण्यावाचून गत्यंतर नव्हते या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. आणीबाणी का आणावी लागली? आणीबाणी ही आदर्श स्थिती होती असा तिचा गौरव कोणीही केला नाही. आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. प्रक्षोभाचा डोंब उठून जेव्हा अराजक निर्माण झाले आणि तसा भयानक धोका निर्माण झाला, त्यावेळीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. संप, बंद, घेराव यांनी त्या काळात उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य जीवनाची अवस्था या ‘बंद’वाल्यांनी बिकट करून सोडली होती. राजकीय खून व स्फोट घडविले जात होते. हे राष्ट्रावरचे संकटच होते.
  • इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे!.
  • भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त हा मजकूर लिहीत असताना आले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे ‘साव’ आहेत? आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे.
  • वृत्तपत्रांसह मीडिया हाऊसेसवर राजकीय नियंत्रण ठेवले जातेय. निवडणुका जिंकण्यासाठी, विरोधकांना खच्ची करण्यासाठी त्याच क्षुद्र कारवाया, तेच डावपेच आखले जात आहेत. घटनात्मक संकेत पायदळी तुडविण्याबाबत तोच उतावीळपणा दाखवला जोतोय. सर्व काही 1975 प्रमाणेच तर सुरू आहे. क्रांतीच्या नावाने तोच बेशरमपणा, दोन-चार लोकांभोवती गोंडे घोळणारी तीच लाचारी. त्या वातावरणात खरेच काही बदल झाला आहे काय? ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या देवकांत बरुआ यांनी केली. आज इंदिरा गांधींची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली. सरदार पटेल यांचे नाव बदलून एका भव्य स्टेडियमला मोदी यांचे नाव देण्यात आले, तेव्हा देवकांत बरुआ आजही जिवंत आहेत असे वाटले,” असे राऊत यांनी म्हटलंय.