Anna Hazare: कोरोना लसीकरणाबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मोठे वक्तव्य
Anna Hazare (Photo Credits: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. राज्यात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. राज्यातील 250 पेक्षा अधिक केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहेत. या लसीकरणासाठी राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंसह सामन्य नागरिकांकडूनही कोरोना योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी लसीकरणाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

"कोरोनावर लस आली, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मला मरणाची भीती नाही. मात्र, समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारी जी माणसे आहेत, त्यांनी पहिला डोस घेतला पाहिजे. आधी वाट पहात बसायचे आणि लस आल्यावर ती इतरांना घेऊ द्यायची आणि यशस्वी झाल्यावर आपण घ्यायची याला काही अर्थ नाही", असे अण्णा हजारे म्हणाले आहेत. दरम्यान, अण्णा हजार यांनी केलेले हे वक्तव्य नेमके कोणासाठी होते? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. हे देखील वाचा- 'कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'- CM Uddhav Thackeray

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या महामारीमुळे देशातील नागरिकांना आर्थिक, बेरोजगारी यांसारख्या अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र, या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश आल्याचे दिसत आहे. लवकरच महाराष्ट्रासह संपूर्ण देशा कोरोनाच्या संकटातून मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकूण 3 हजार 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. यापैकी 18 लाख 86 हजार 469 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात कोरोनामुळे 50 हजार 738 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 52 हजार 562 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.