
देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पिंपरी–चिंचवड महापालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच 100 कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा असून त्यासाठी 7.85 टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
शेअर बाजारात कर्जरोखे ‘लिस्टिंग’ करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. कॉर्पोरेट’ अटी शर्तींची पूर्तता करीत लिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे 20 कोटीचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे, हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने 200 कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यू करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात 100 कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण 513 कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला 5.13 पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून ‘एए +’ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.