Palghar: पालघर येथे आदिवासी जमावाने चोर समजून केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू; मरण पावलेल्यांमध्ये दोन साधूंचा समावेश
Lynching (Photo Credits: IANS/ Representational Image)

सध्या कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) चालू आहे व त्यामुळे लोक घरातच आहेत. मात्र पालघर (Palghar) येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील आदिवासींच्या एका टोळीने (Tribal Mob) चोर असल्याच्या संशयावरून, चालकासह तीन व्यक्तींना मारहाण केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. या तीनही लोकांना लाठीने मारहाण करण्यापूर्वी जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली व यामध्ये जखमी झालेल्या या तीनही व्यक्तींचे निधन झाले. दाभाडी-खानवेल रोडवर  ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित लोक नाशिकहून इको व्हॅन मधून प्रवास करीत होते. दाभाडी-खानवेल रोडवर जवळजवळ 200 आदिवासींच्या जमावाने त्यांचे वाहन अडवले. जमावाने या तीनही लोकांची चौकशी मात्र त्यानंतर या तिघांना मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर आदिवासींनी पोलिस व्हॅनचेही नुकसान केले. या घटनेमध्ये जूना अखाड्यातील दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यावर साधू-संतांपासून ते सोशल मीडियापर्यंत लोकांमध्ये रोष पसरला आहे. आरोपींवर कारवाई न झाल्यास उद्धव ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार, असा इशारा अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी दिला आहे. (हेही वाचा: Coronavirus: पालघर येथे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 379 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल)

दरम्यान, गावात अफवा पसरल्या होत्या की बाहेरील लोक आदिवासींची गावे लुटत आहेत. यामुळेच हे लोक त्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर नजर ठेऊन होते व त्यांच्यावर दगडफेक करीत होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूमध्ये एका दलित व्यक्तीला जमावाने मारहाण केली होती. चेन्नईच्या विल्लुपुरम शहरात 12 फेब्रुवारी रोजी जमावाने ही मारहाण केली. एस पुदुर गावात 24 वर्षीय आर सक्तीवेल शौचास जाण्यासाठी थांबला असता जमावाने त्याला ठार मारले होते.