'राज्यामध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही'- सुभाष देशमुख
Subhash Deshmukh (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसेच भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन अधिक वाद निर्माण झाल्यानंतर शेवटी यांची युती तुटली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. यावर भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करुन घेतले आहे. राज्यामध्ये सर्वाधिक आमदारा निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही, असा दावा सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आला तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने कौल दिला असून मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली. त्यानंतर भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले. दरम्यान, शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर भाजपचे नेते सुभाष देशमुख म्हणाले की, "भाजप आणि शिवसेनेला हिंदुत्वाच्या आधारावर जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा, हा अलिखित नियम आहे. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करताना भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे. मात्र शिवसेनेने जास्त मागण्या केल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेला विलंब झाला.' तसंच, जोपर्यंत शिवसेना- भाजप एकत्र येत नाही तोपर्यंत युतीतील तिढा सुटणार नाही". महायुतीने सत्तास्थापन न करुन जनतेची निराशा केली असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. हे देखील वाचा- Maharashtra Government Formation: महाराष्ट्रात सत्ता कोंडी आज फुटण्याची शक्यता; NCP, कॉंग्रेस सह शिवसेना पक्षासोबत मुंबईमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज मुंबई येथे सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दोन्ही पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्रात लवकरच सत्ता स्थापन होणार आहे, असा दावा अनेक पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.