Food Poisoning: बीड जिल्ह्यात अन्नातून विषबाधा, 100 अत्यावस्थ; नवारत्रीची भगर महागात पडली
Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शारदीय नौरात्र (Navratri 2022) उत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्रात बीड (Beed District) जिल्ह्यात पहिल्याच दिवशी उत्सवाला काहीसे गालबोट लागले आहे. बीड जिल्ह्यात नवरात्री उपवासानिमित्त भगर खाल्याने 100 पेक्षा जास्त जणांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये नाळवंडी, जुजगव्हाण, पोळवाडी आणि पाली येथील ग्रामस्थांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्यांवर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.

एकाच वेळी चार गावातील नागरिकांनी भगर खाऊन त्यांना विषबाधा झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्हा शैली चिकित्सक सुरेश साबळे यांनीही या घटेची तत्काळ दखल घेतली. विषबाधा झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात धाव घेऊन स्वत: उपचार सुरु केले. या वेळी शंभरपेक्षा अधिक नागरिक रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे रुग्णालयातील प्रशासन यंत्रणेवर जोरदार ताण आला. मात्र, प्रशासाने वेळेचे गांभीर्य पाहून आवश्यक हालचाली सुरु केल्या. (हेही वाचा, दहिसर: वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 28 जणांना विषबाधा)

भारतीय हिंदु सण-उत्सवांमध्ये उपवासांना अधिक महत्त्व आहे. अशा वेळी नागरिक स्वत: किराणा दुकानातून साबुदाणा अथवा उपवासासाठी लागणारे आवश्यक घटक विकत घेतात आणि घरी जाऊन पदार्थ बनवतात. मात्र, जेव्हा नवरात्र, गोकुळाष्टमी, रामनवमी असे काही सण उत्सव असतात, अशा वेळी सार्वजनिक ठिकाणीही भगर किंवा साबुदाणा पदार्थ बनवले जातात. यात प्रामुख्याने सार्वजनिक मंडळे, संस्था आदींचा समावेश असतो. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असे पदार्थ बनवले जातात तेव्हा आवश्यक गोष्टींची काळजी घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा विषबाधेसारखे प्रकार घडतात.