जेष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर करणार 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य-फेसबुक)

ज्येष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर (N.D.Mahanor) यांच्या हस्ते 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन होणार आहे. नितीन तावडे यांनी ही माहिती दिली. सालाबादप्रमाणे पुढील वर्षीचे म्हणजे 2020 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे पार पडणार आहे. 2020 मधील 93 वे संमेलन असणार आहे. या संमेलनाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा करणार आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांची या  साहित्य संमेलन अध्यक्षपदी झालेली निवड झाली आहे.

गेले अनेक वर्षे मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन घ्यावे अशी मागणी करण्यात येत होती. मात्र प्रत्येकवेळी मंडळाने मोठ्या शहरांना प्राधान्य दिले. आता अखेर 2020 च्या साहित्य संमेलनाच्या यजमानापदाचा मान उस्मानाबादला मिळाला आहे. 10 ते 12 जानेवारी रोजी हे संमेलन होत आहे. अंतिम ठिकाणासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार शहरांमध्ये स्पर्धा रंगली. शेवटी 20 जणांच्या सहमतीने उस्मानाबादवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महानोर यांच्या साहित्य संपदेबद्दल बोलायचे झाले तर, अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश’ व संजीवन आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ना. धों. महानोर यांना 1991 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या ‘पानझड’ या पुस्तकास 2000 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (हेही वाचा:संमेलन अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीनंतर साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांना फोनवरुन धमक्या)

दरम्यान, यावर्षीच्या यवतमाळ येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाला फार मोठे गालबोट लागले. जो वाद निर्माण झाला त्यामुळे अनेक लेखकांनी त्या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. मात्र उस्मानाबादचे साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडेल, असा विश्वास ठाले यांनी व्यक्त केला.