मुंबई: जेवणातली चिकन करी संपवली म्हणून मित्रांनी केला खून; पोस्टमार्टम मध्ये उघड झाला धक्कादायक प्रकार
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

भुकेने माणूस वेडापीसा होतो हे तर आपण ऐकून असाल पण या वेडेपणच्या नादात आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना सध्या समोर येत आहे. मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police)  अलीकडेच आलेल्या या नव्या प्रकरणात, कचरा वेचणाऱ्या चार मित्रांनी पार्टी करायची ठरवली असताना, या पार्टीत त्यातील दोघांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचे समजत आहे. आश्चर्य म्हणजे पार्टी मध्य बनवण्यात आलेली शुल्लक चिकन करी ही या खुनाचे कारण ठरली आहे. पार्टी दरम्यान दारू संपली म्ह्णून हे मित्र घराबाहेर गेले होते, इतक्यात घरी थांबलेल्या मित्राने चिकन करी फस्त केली, आणि जेव्हा बाकीचे मित्र घरी आले आणि त्यांना चिकन संपल्याबद्दल समजले तेव्हा त्यांच्या इच्छेवर पाणी फिरल्याने त्यांनी चिकन संपवणाऱ्या मित्राला चक्क जीवानिशी मारून टाकले आहे. या प्रकरणात, सुनील नेपाळी (Sunil Nepali) या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर मुथुकुमार नादर (Muthukumar Nadar), अनिल कांबळे (Anil Kambale), आणि अलीस मिथुन (Alias Mithun) या तीन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या घडतेवेळी या सर्वानी मद्यपान केले होते, आणि दारू संपली म्ह्णूनच ते घराबाहेर पडले होते, यावेळी सुनील आणि अन्य एक मित्र अर्जुन हे घरी राहिले होते, या दोघांनी मिळून चिकन संपवले आणि त्याच सुस्तीमध्ये त्यांना झोप लागली. जेव्हा मुथुकुमार, अनिल आणि अलिस घरी आले आणि त्यांनी रिकामे पडलेले भांडे पाहिले तेव्हा रागात येऊन त्यांनी बाहेरून दगड उचलून आणला आणि त्यांनी सुनील याच्या छातीवर आणि चेहऱ्यावर दगडाने मारायला सुरुवात केली. या मारहाणीत सुनील याचा मृत्यू झाल्यावर त्यांनी स्वतःच पोलिसांकडे जाऊन सुनीलचा रेल्वे रुळाच्या जवळ अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी सुनीलचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला असताना त्यात हा खून असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चिकन करी संपल्याचे कारण सुद्धा चौकशी दरम्यान समोर आले आहे, पोलिसांच्या मते यामध्ये पूर्व वैमनस्य देखील असून शकते. याबाबत स्पष्ट तपास झाल्यावर या आरोपींना काय शिक्षा मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.