Muharram 2020: महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या 'मोहरम' बाबत मार्गदर्शक सूचना; यंदा मातम मिरवणूकीला परवानगी नाही
Muharram procession in Ajmer (Photo credit: IANS)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सध्या देशामध्ये सर्वच सण आणि उत्सव अगदी सध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. सध्या राज्यात गणेशोत्सव आणि मोहरम (Muharram 2020) असे दोन सण साजरे होणार आहेत. आता महाराष्ट्र शासनाने मोहरम संदर्भातील नियमावली प्रसिद्ध केली आहे. 22 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या, गणेशोत्सवासाठी याआधीच नियमावली जाहीर करत शासनाने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मोहरम बाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेत, यंदा धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, असे सांगितले आहे.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना विहित करण्यात येत आहेत –

> मातम मिरवणूक- कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहून दुखवटा पाळण्यात यावा, केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

> वाझ/मजलीस - हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे.

> ताजिया/आलम- ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावेत. (हेही वाचा: Muharram Images & HD Wallpapers: इस्लामिक नववर्ष 2020 च्या शुभेच्छा WhatsApp Stickers, Messages च्या माध्यमातून देण्यासाठी शुभेच्छापत्रं)

> सबील/छबील- सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे.

> कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही.

सरकारने शेवटी म्हटले आहे, कोविड- 19च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, प्लाज्मा शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.