Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम, कुठे संततधार, जाणून घ्या आजचे पर्जन्यमान
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon 2021) जोमात दिसतो आहे. मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार बॅटींग केल्यानंतर काही ठिकाणी अलपविश्रांती घेत दमदार कामगिरी (Maharashtra Rain Updates) कायम ठेवली आहे. त्यामुळे वातावरणातील एकूण नूर पाहता हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आगोदरच व्यक्त केला आहे. दरम्यान, रडारवर उपग्रहातून प्राप्त छायाचित्रांवरुन आज रोहा, रायगड, श्रीवर्धन, हर्णे, दापोली, ठाणे आदी भागात मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची अधिक शक्यता आहे. मुख्य म्हणजे मुंबईसह राज्यातील इतर अनेक ठिकाणीही पाऊस जोरदार बरसत आहे.

मुंबईत पावसाचा लपंडाव

मुंबई शहरात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी पश्चिम आणि पूर्व मुंबई उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडतो आहे. दक्षिण मुंबई परिसरात (South Mumbai) आज पाऊस विश्रांती घेताना दिसत आहे. (हेही वाचा, IMD Monsoon Prediction: मान्सून यंदा पूरेपूर बरसणार! सरासरीच्या 101% पर्जन्यवृष्टीची शक्याता- हवामान विभाग)

कोकणात दमदार

कोकणामध्ये पाऊस दमदार हजेरी लावतना दिसतो आहे. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि नारंगी नदी दुथडी भरुन वाहात आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीपुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचेही पाहायला मिळाले.

कोकणात रायगड जिल्ह्यामध्येही सकाळपासून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात असलेल्या आंबा ,कुंडलिका,सावित्री या तिन्ही नद्या तुडंब झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्याने धोक्याची सीमा ओलांडली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मंदावला

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणातून साधारण 33 फूट 7 इंच इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळेही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाने कही काळ उघडीप दिली आहे. पुण्यात पावसाने उघडीप दिल्याने ऊन पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 7 टीएमसी पाणी पुरवठा झाला आहे.