
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक, वन्यजीव अभ्यासक आणि विश्वविख्यात पक्षीशास्त्रज्ञ मारुती चितमपल्ली यांचे निधन (Maruti Chitampalli Passes Away) झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. महाराष्ट्राचा अरण्यऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तिमत्वाने सोलापूर येथील राहत्या घरी बुधवारी (18 जून) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उल्लेखनीय असे की, पाठिमागील म्हणजेच मार्च महिन्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले होते. दिल्ली येथे जाऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. मात्र, दिल्लीवरुन आल्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावत गेली आणि अखेर त्यांच्या निधनाचे वृत्त आले.
सरकारी सेवत असूनही पद्मश्री पुरस्कार
मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. त्यांचा अभ्यास आणि विचार याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला फायदा होत असे. त्यामुळेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते, अशी आठवण भाजप आमदार आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना दिली. मुनगंटीवार यांनी विशेष उल्लेख करत सांगितले की, पद्मश्री पुरस्कार सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तीस नियमाने देता येत नाही किंवा सरकारी नोकर राहिलेल्या व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. पण, चितमपल्ली हे सरकारी सेवेत असून देखील त्यांनी केलेल्या कार्याचा विचार करुन भारत सरकारने त्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला आणि त्यांना तो सन्मानपूर्वक दिला, अशी आठवणही मुनगंटीवार यांनी या निमित्ताने सांगितली. (हेही वाचा, Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या)
चितमपल्ली यांचे योगदान
मारुती चितमपल्ली हे एक प्रसिद्ध भारतीय निसर्ग अभ्यासक, वन्यजीव संरक्षक आणि मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र राज्य वनसेवेत काम केले आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेलघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
चितमपल्ली यांनी मराठी साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले असून त्यांनी रातवा, रानवाटा, निळावंती, प्राणीकोश, पक्षीकोश यांसारखी अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत. 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लेखनातून त्यांनी निसर्ग आणि वन्यजीवांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले.